Friday, December 3, 2010

new maratha reservation committee in maharashtra

मराठा आरक्षणासाठी पुन्हा नवे 'शिलेदार'
सकाळ वृत्तसेवा
Saturday, December 04, 2010 AT 12:09 AM (IST)

मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा संघटनांत मानापानाचे नाट्य सुरू असताना आरक्षणाची धुरा खांद्यावर घेतलेल्या "सरदारांना' बगल देत, नव्या शिलेदारांनी संघर्ष समिती स्थापन केली आहे. डॉ. मनीष वडजे यांच्या अध्यक्षतेखाली "मराठा संघर्ष समिती'ने मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणण्याची तयारी सुरू केली आहे. समितीमध्ये दहा मराठा संघटनांचा सहभाग असून कुणबी सेनाही या समितीमध्ये सहभागी झाली आहे; मात्र आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असलेल्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि शिवसंग्राम या संघटनांचा यामध्ये समावेश नाही.

मराठा समाजाला "ओबीसी'मध्ये समाविष्ट करून 25 टक्‍के आरक्षण मिळावे, अशी प्रमुख मागणी घेऊन ही समिती काम करणार असल्याचे अध्यक्ष डॉ. वडजे यांनी सांगितले. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे दोन्ही समाज एकच असून, यामध्ये फरक नसल्याचे मत या समितीने व्यक्‍त केले आहे; मात्र या वादाचा फायदा घेत समाजात मतभेद निर्माण करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवून नवीन समिती आरक्षणाचा मुद्दा हाती घेत असल्याचे वडजे यांनी स्पष्ट केले.

शिवसंग्रामाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण कृती समितीची स्थापना झाली होती; मात्र यामध्ये फूट पडल्याने सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची फेररचना करण्यात आली. दोन्ही संघर्ष समित्यांनंतर नव्याने स्थापन झालेल्या "मराठा संघर्ष समिती'मध्ये या नेत्यांना बगल देत, नवीन तरुण नेत्यांनी मराठा आरक्षणाची हाक दिली आहे.

मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते किशनरावजी वरखिंडे, छावा संघटनेचे प्रा. देविदास वडजे, अध्यक्ष आण्णासाहेब जावळे आणि किसन खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन समिती काम करणार असल्याचे डॉ. वडजे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात नारायण राणेंची उडी
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 06, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई - मराठा आरक्षण चर्चेत असतानाच आज महसूलमंत्री नारायण राणे यांनीही या प्रश्‍नाच्या लढ्यात उडी घेतली. सध्या सर्व समाजाला आरक्षण मिळत आहे. बहुजन समाजातही गरिबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विनायक मेटे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेला राणे यांनी जलसंपदामंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्या साक्षीने पाठिंबा जाहीर केला. माथाडी कामगारांचे नेते (कै) अण्णासाहेब पाटील यांच्या सन्मानार्थ टपाल विभागाने काढलेल्या विशेष लिफाफ्याच्या अनावरणावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राणे बोलत होते.

राणे यांनी "मराठा' या शब्दाचा थेट उच्चार टाळला. अण्णासाहेब पाटील यांनी बहुजनांच्या हितासाठी निर्भीडपणे लढा दिला, असे नमूद करून आरक्षणासाठी आपण निर्भीड होऊ नये असे कोणी सांगितले आहे का? असा सवाल त्यांनी मेटे यांना केला. मंत्रिमंडळात अजित पवार आणि जयंत पाटील कोणती भूमिका घेतील हे मला माहीत नाही; मात्र आरक्षणाच्या विषयात आपण मेटेंसोबत आहोत, असे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, मराठा समाजातल्या आर्थिक दुर्बलांसाठी राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली; मात्र त्याला पुरेसा निधी मिळत नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. त्याचा संदर्भ देत पवार म्हणाले, की अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या महामंडळाला निधी मिळावा यासाठी पुरवणी मागणीत तरतूद करण्याचा निर्णय घेतला जाईल.




मराठा आरक्षण मागणीत नेत्यांकडून सौदेबाजी - नितेश राणे
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 16, 2010 AT 12:00 AM (IST)

डोंबिवली : मराठा आरक्षणाची मागणी रास्त असून मराठा आरक्षण लढ्यात स्वाभिमान संघटना पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाच्या पाठीशी आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यातून प्रामाणिक नेतृत्व घडविण्याची खरी गरज आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीत समाजाची काही नेतेमंडळी सौदेबाजी करीत आहेत. अशा गद्दार नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी येथे दिला.

मराठा आरक्षण संघर्ष समिती कोकण विभागातर्फे येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात "मराठा आरक्षण निर्धार' मेळावा शुक्रवारी (ता.14) झाला. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार रवींद्र चव्हाण, समितीचे विजयसिंह महाडिक, विजयसिंह पाटणकर, वामन भिलारे, सुरेंद्र ढवळे, अनिल नायगुडे, नगरसेवक विश्‍वनाथ राणे, तात्या माने, शाहू सावंत, प्रतिभा कदम, सीमा सावंत उपस्थित होते. या वेळी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष राणे यांनी सांगितले, की मराठा आरक्षणाच्या चळवळीत माझा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्यावर मी बारीक नजर ठेवून असतो. महाराष्ट्राच्या निर्मितीचे 50 वे वर्ष साजरे करीत असताना मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

मराठा समाजाच्या अनेक नेतेमंडळींनी समाजाला विकण्याचे काम केले आहे. समाजाच्या नावाखाली सौदेबाजी केली आहे. त्यांना समाज जोपर्यंत शिक्षा देणार नाही तोपर्यंत समाजाला खरा नेता मिळणार नाही. मराठा समाजाच्या आर्थिक सुबत्ता आणि विकासासाठी आरक्षणाची गरज आहे. आरक्षण कशासाठी मागतो याचाही सारासार विचार होणे गरजेचे आहे. राजकीय आरक्षणाशी मी सहमत नाही. मराठा समाजातील तरुणांना रोजगार आणि शिक्षण मिळावे, यासाठी आरक्षणाची गरज आहे. या मागणीसाठी स्वाभिमान संघटनेची ताकद पूर्णपणे समाजाच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास सावंत यांनी केले.

मराठा आरक्षण समिती संघर्षाच्या पवित्र्यात
-
Friday, April 09, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई - मराठा समाजास इतर मागासवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी उत्पन्नाची अट शिथिल करून राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीने पुन्हा एकदा केली आहे. मराठा समाजास आरक्षण न मिळाल्यास यापुढील काळात आंदोलन उभारावे लागेल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. या संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी हे आरक्षण राज्यातील एकतृतीयांश जनतेस कसे लाभदायक ठरेल, हेदेखील सोदाहरण पटवून दिले. मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून येणाऱ्या पुढाऱ्यांना यापुढे संघटनेचे पदाधिकारी अशा खोट्या आश्‍वासनांबद्दल जाब विचारतील, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठा समाजातील बहुतांश मुले ही रोजगार हमी योजनेच्या कामावर जात आहेत याची खात्री शासनाने द्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. मूठभर मराठा श्रीमंतांकडे पाहून हा समाज श्रीमंत असल्याचा गैरसमज पसरविण्यापेक्षा एकूण समाजाचा सर्वांगीण विचार करून हे आरक्षण देण्यात यावे, असेही यावेळी सांगण्यात आले

मिळेल तेवढे घेऊ, बाकीचे नंतर पाहू!
सकाळ वृत्तसेवा
Monday, March 22, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई - नोकरी, शिक्षण या क्षेत्रामध्ये जितके आरक्षण संमत करण्यात येईल तितके पदरात पाडून घेऊन, त्यानंतर भविष्यात पुढील वाटचाल निश्‍चित करू, अशी भूमिका अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुंबई अध्यक्ष अभिजित राणे यांनी आज गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा परिषदेत मांडली.

मराठा आरक्षणाबाबत यापुढील काळात आपली भूमिका काय असावी, हे स्पष्ट करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेस अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुरेशदादा पाटील, मुंबई अध्यक्ष विजयसिंह पाटणकर; तसेच मुंबई-ठाण्यातील महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा समाजास आरक्षण मिळण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशीही चर्चा झाल्याचे राणे यांनी या परिषदेमध्ये सांगितले. मराठा समाजाचा सर्वांगीण विकास, मराठा समाजातील आरक्षण, अखिल भारतीय मराठा महासंघाची वाटचाल, मराठा समाजाचे एकत्रीकरण, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा; तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्‍नांवर आक्रमक भूमिका व आरक्षणाच्या प्रश्‍नांवरील लढतीची दिशा या परिषदेमध्ये ठरविण्यात आली.